मुंबई : . एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड यांना लागवला आहे. माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यशवंत भांगरे माझ्या अगोदर ५ वर्ष अगोदर विधानसभेत होते. ते मला ज्येष्ठ होते. अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे याचा मोठा सहभाग होता, असं पवार म्हणाले. अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केले.
या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या मात्र एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहका-यांच्या अंगात यायला लागलं, असा टोला शरद पवार यांनी पिचड यांना लगावला.
राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली त्यावेळी जनतेच्या मनातल कळालं होते. जनतेला परिवर्तन हवं होते ते झालं आहे, असं शरद पवार म्हणाले. अकोले येथील येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याची माहिती मिळाली. कारखान्यावर 200 कोटीच कर्ज झाले, जे या कर्जाला जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा, अशा शब्दात शरद पवार यांनी पिचड यांच्यावर नाव न घेता दुसऱ्यांदा टीका केलीय. शुक्राचार्यांना बाजूला केल्यास कारखाना चालवण्यासाठी सर्व ती मदत मी करतो, असं आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.
अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना अकोले तालुक्यातील जनतेला आश्वासनं दिली आहेत. ती आश्वासनं पूर्ण करा, असा सल्ला शरद पवार यांनी हसन मुश्रीफांना दिला. ते पूर्ण करताना अडचणी आल्या तर मला सांगा, असंही पवार म्हणाले.