शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आला आहे. या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी अनेक मुद्यांवर आपले मत मांडले आहे. यावेळी त्यांना कोरोना व्हायरस संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, कोरोना हा दैनंदिन जीवनाचा भाग होणार आहे हे मान्य करुनच आपण पुढील वाटचाल केली पाहिजे. याचा एक धडा देखील पाठ्यपुस्तकात असावा, असे ते म्हणाले.
लॉकडाऊनचेही परिणाम उद्योगधंदे आणि इतर गोष्टींवर झाले आहेत. इथून पुढे आपल्या पाठ्यपुस्तकातील जो काही अभ्यासक्रम आहे, त्याच्यामध्ये हा सगळा कालखंड जो काही आपण गेल्या दोन महिन्यांपासून अनुभवला आहे. या संबंधीच्या ज्या काही काळजी घेण्याची किंवा खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. यावर आधारित एखाद-दुसरा धडा पाठ्यपुस्तकात असणे आवश्यक आहे, असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, “मी काही तज्ज्ञांनी बोललो त्यांच्या सांगण्यानुसार साधारणपणे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तो (कोरोना) ट्रेंड खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पुर्ण तळाला जाईल आणि पुन्हा नॉर्मलन्सी येईल. मात्र याचा अर्थ तो कायमचा संपला असे नाही.