मुंबई : शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त बैठक झाल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उदय सामंत हे स्वत:हून फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते, असा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला होता. उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राणेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
उदय सामंत म्हणाले, मी आजपर्यंत कधीही राणे कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची दखल घेतलेली नाही आणि इथून पुढेही घेणार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीचा खुलासा मी दुपारी एक वाजता पत्रकारपरिषद घेऊन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे विरोधकांच्या असल्या आरोपांमुळे माझे कुठलेही राजकीय नुकसान होणार नाही, असे उदय सामंत यांनी म्हटले. त्यामुळे आता पत्रकारपरिषदेत उदय सामंत काय खुलासा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूमपर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले, असे ट्विट निलेश राणे यांनी केले होते. तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भेट झाली का?, भेट झाली असल्यास त्याचं नेमकं कारण काय?, दोघांमध्ये नेमकी कसली चर्चा झाली?, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.