राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात काल (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली. उदयनराजे यांनी इंग्रजी भाषेत दमदार आवाजात शपथ घेण्यास उदयनराजेंनी सुरुवात केली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी “जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” अशी घोषणा दिली.
“तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या” अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली. यासर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘जय भवानी जय शिवाजी’ असे लिहून वीस लाख पत्र पाठवणार आहे, तर ब्राह्मण महासंघाने नायडूंच्या माफीची मागणी केली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू माफी मागत नाहीत, तोपर्यंत खासदार उदयनराजे यांनी राज्यसभेच्या कामात भाग घेऊ नये” अशी भूमिका ब्राह्मण महासंघाच्या अनिल दवे यांनी घेतली आहे.“नायडू आणि भाजपने आम्हा शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी” अशी मागणी अनिल दवे यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी जय शिवाजी’ असे लिहिलेली वीस लाख पत्रे जालना जिल्ह्यातून पाठवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोस्टकार्ड पत्र पाठवले.