मुंबई : येत्या 20 जानेवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालय 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याबाबत विचार आहे, असे वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. काही वेळापूर्वी उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थी, प्राचार्य आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
“येत्या 20 जानेवारीपर्यंत 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारे महाविद्यालय सुरु करण्याचा विचार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल,” असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे यांसह इतर विषयांवर उदय सामंतांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला.
“राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी विविध विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय जाहीर करु,” असेही उदय सामंत यांनी सांगितले.“प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणेच विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे आणि सहाय्यक प्राध्यापक पदे भरण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.