मुंबई : राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ५ एप्रिल पासून नवी करोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या एकीकडे सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, करोना साथीचा हा वाढता फैलाव थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून जे कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यावरून विरोधी पक्ष आणि व्यापारी आवाज उठवताना दिसत आहेत. ‘निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊनच लावला असून, सरकारकडून जनतेची घोर फसवणूक सुरु आहे. दररोज बदलणारे प्रतिबंधक नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने, हे पाहता राज्य सरकारची परिस्थिती, ”कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं” अशी झाली असल्याची फिल्मी शैलीतून टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी उपाध्ये म्हणाले की, ‘राज्यातला करोना साथीचा फैलाव बघता कठोर निर्बंध लावले जाणार असून, केवळ शनिवारी, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल, असे सरकारने जाहीर केले होते. तसेच अशाचप्रकारचे वृत्त, विविध वृत्तवाहिन्यावरून देखील सांगितले जात होते. मुख्यमंत्र्यांनी तसेच सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी, जनतेच्या हिताचा सारासार विचार करून हा निर्णय घेतला असल्याचेही आवर्जून सांगितले होते. मात्र, मंगळवारी राज्यभरातली गोंधळाची परिस्थिती पाहता, राज्य सरकारने विरोधी पक्षांसह जनतेची सुद्धा फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.’
यावेळी त्यांनी आघाडी सरकारला कठोर निर्बंध लावायचे आहेत की लॉकडाऊन, असा सवाल देखील उपस्थित केला. त्याचसोबत राज्यावरील हे संकट टळण्यासाठी, जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारला साथ देण्यास भाजप तयार आहे मात्र, सरकारने सामान्य, गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने या वर्गाला आर्थिक मदत द्यावी असे भाजपाने सुचवले होते. मात्र, रविवारी आपला निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकट काळात जनतेचे काय? हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसावा काय? सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते? असा हल्लबोल भाजपाने सरकारवर केला आहे.