केंद्र सरकार व युजीसीविरोधात विद्यार्थी भारती या विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी कल्याण येथील संघटनेच्या कार्यालयात आमरण उपोषण सुरू केले होते.मात्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्थी नंतर हे उपोषण मागे घेतले आहे.
अंतिम वर्षीय परीक्षांचा तिढा संपता संपत नसल्याने विद्यार्थ्यांनी आता आंदोलनाचे अस्त्र उगारण्यास सुरुवात केली होती. राज्याचे उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांंना माहिती कळताच त्यांनी उपोषणस्थळी धाव घेत मंजिरीची भेट घेतली. . दरम्यान तनपुरे यांनी उपोषण स्थळी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन लावत विद्यार्थ्यांनाशी बोलणं करून दिले. परीक्षा रद्द व्हाव्यात यासाठी खासदार म्हणून मी पूर्ण प्रयत्न करेन. आपण उपोषण सोडावे अशी विनंती सुळे यांनी मंजिरीला केली. सुळे यांना मान राखत मंजिरीने उपोषण सोडले.
विद्यार्थीनींशी संवाद साधताना तनपुरे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची जाण शासनाला आहे म्हणून शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता मात्र युजीसीने नवीन गाईडलाईन्स जाहीर करत परीक्षा घेण्याचा आग्रह धरला आहे. राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात फोफावत आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे शासनाला मान्य नाही म्हणून परीक्षा रद्द व्हाव्यात याच प्रयत्नात आम्ही सर्व आहोत. विद्यार्थी भारती संघटनेने १० मुदत सरकारला दिली आहे. १० दिवसाच्या आत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला गेला नाही तर पुन्हा उपोषण केले जाईल असे विद्यार्थी भारतीने जाहीर केले आहे.