मुंबई : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी तूर्तास लॉकडाऊन केला जाणार नसला, तरी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला. त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊन च्या चर्चांना रोख लागलेला नाहीये.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी, विद्यार्थ्यांसाठी आज ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून एक मोठी घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ज्या प्रकारे राज्यात करोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिसस्थिती लक्षात घेऊन मी, इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक मुल्यमापना संदर्भात बोलणार आहे. करोनाच्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं. ५ वी ते ८ वी च्या शाळादेखील सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत.
परंतु मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. तसेच, यावर्षीची करोनाची परिस्थिती पाहता आणि वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेत असताना, आम्ही शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय घेत आहोत की, १ ली ते ८ वी चे जे विद्यार्थी आहेत, त्यांना आरटीईच्या अधिकाराच्या कायद्यांतर्गत, सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येत आहे.
राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊनच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक (८ वी पर्यंत) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा पप्रश्न मार्गी लागला असून, आता उर्वरित विद्यार्थ्यांचे हित आणि होणाऱ्या नुकसानाचा अंदाज घेऊन सरकार त्यांच्या बाबतीत देखील काय निर्णय घेणार याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.