मुंबई – कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिल्याने, ठाकरे सरकारला मोठा दणका बसला आहे.भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडता, असा टोला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
“मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार, कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे MMRDA ला निर्देश…गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात. जनतेची विटंबना, वेळेचा अपव्यय, पैशाचा चुराडा आणि अब्रूचे खोबरे हीच महाविकास आघाडी सरकारची खरी कमाई…”असं भातखळकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिले असून भूखंड आहे त्या स्थितीत ठेवण्यास सांगितलं आहे. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. फेब्रुवारीत याप्रकऱणी अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.