पुणे – महाविकास आघाडीची सत्ता आली नसती तर जयंत पाटील आज भाजपमध्ये असते, भाजप नेते नारायण राणे यांनी केलेल्या या दाव्याची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खिल्ली उडवली आहे. राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. राणे नेमकं कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले?, असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी राणेंच्या विधानाची खिल्ली उडवली आहे.
बारामती मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदानासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. राणे कोणत्या जयंत पाटलांविषयी बोलले मला माहीत नाही. महाराष्ट्रातील राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. मी स्वत: चार-पाच जयंत पाटलांना ओळखते. ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांविषयी बोलले असतील असं वाटत नाही, असं त्या म्हणाल्या.
राणे काय म्हणाले होते?
जयंत पाटील यांना त्यांच्या इस्लामापुरात जाऊन उत्तर देणार. पुढचे सरकार आमचेच येणार हे बोलण्याऐवजी जयंत पाटील पुढील सरकारमध्ये मीच मंत्री असेन असं बोलले असतील. आज जर महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती. हे सर्व मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उघड करणार आहे.