मुंबई : वृत्तपत्र, माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलाणारे सध्या गप्प आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला काही दिवसांपूर्वी तुरुंगात टाकले होते. कुणाचा एकेरी उल्लेख करू नये हे मान्य. पण माध्यमांनी सरकारच्या विरोधात बोलूच नये, ही या सरकारची भूमिका आहे.अशा कडक शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनामध्ये फडणवीस हे बोलत होते.गेल्या काही दिवसांपासून पत्रकार अर्णब गोस्वामी सत्ताधारी शिवसेनेविरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते.त्यानंतर आज सेना आमदारांनी अर्णब विरोधात हक्कभंग आणल्यानंतर माध्यमांवर सरकार दबाव टाकत असल्याचे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
एखादे माध्यम सरकारच्या विरोधात गेले की नोटीस द्या, हक्कभंग लावा, असा कारभार चाललाय. मग हीच भूमिका सामनाच्याबाबतीतही लावा असे परखड मत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मांडले. सामनामध्ये देखील पंतप्रधान, राज्यपाल यांच्याबाबत काय बोललं जातं याचा आढावा घ्या असे फडणवीस यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा मान राहिला पाहिजे. आम्हीही त्यांचा सन्मान करतो मात्र राज्यपाल, पंतप्रधानांना, इतर नेत्यांना मान नाही काय ? असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आज चांगलाच वादळी ठरला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कामकाजाच्या सुरुवातीलाच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभागृगहात गोंधळ घातला होता. त्यानंतर कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं होतं.