मुंबई : कोणाशीही चर्चा न करता शेतकरी विरोधी कायदे लादणारे केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे नसून फक्त सूट बूटवाल्यांचे आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, या कायद्याच्या राज्यातील अंमलबजावणीबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षबाळासाहेब थोरात यांनीही महाराष्ट्रात हे कायदे लागू केले जाणार नाहीत. महाविकास आघाडीचे यावर एकमत आहे. शिवसेना आमच्यासोबत आहे असे रविवारी सांगितले होते.
केंद्राने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. विधेयक संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठवावे, असा आमचा आग्रह होता. किमान पक्षी भाजपने आपला मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाशी याबाबत चर्चा करायला हवी होती असे स्पष्ट मत यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं मोदी म्हणाले होते पण शेतकऱ्यांना सध्या हमीभावही मिळत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी आम्ही आज राज्यपालांकडे केली आहे. याबाबत केंद्राशी चर्चा करू असं आश्वासन राज्यपालांनी दिलं आहे. या कायद्याच्या राज्यात अंमलबजावणीबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल, असे चव्हाण म्हणाले.
या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात २ ऑक्टोबर हा दिवस किसान मजदूर बचाओ दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा व विधानसभा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असेही नमूद करण्यात आले.
भाजपची दोन्ही काँग्रेसवर टीका
काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कोठेही विकता येईल, अशा प्रकारची बंधनमुक्त व्यवस्था तयार करण्याचे आश्वासन दिले होते. कंत्राटी शेतीचा प्रारंभ महाराष्ट्र, हरियाणात काँग्रेस सत्तेत असतानाच झाला होता. आता केवळ विरोधासाठी विरोध म्हणून काँग्रेसने या विधेयकांना विरोध सुरू केला आहे. यावरून शेतकऱ्यांचे भले होऊ नये अशीच काँग्रेस- राष्ट्रवादीची इच्छा आहे, अशी शंका निर्माण होते आहे, असे केशव उपाध्ये यांनी नमूद केले.
Read Also
पवारांनी एनडीएत यावे ! रामदास आठवले यांच्या या विधानाला राष्ट्रवादीने दिले ‘हे’ उत्तरhttps://t.co/oLulArYfQs#RamdasAathavale #SharadPawar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020