पंढरपूर : महाराष्ट्रात सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सरकार बदलायचं माझ्यावर सोडा’, असे विधान प्रचारसभेत केले होते. त्यांच्या या विधानाचा कालच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खरपूस समाचार घेत, भाजपचे नेते पंढरपुरात येऊन ‘तुम्ही इथला आमदार निवडून द्या, राज्यातलं सरकार पाडून दाखवतो’, अशी वक्तव्ये करत आहेत. त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, असा हल्लबोल करत थेट इशारा दिला.
याला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘राज्यात सत्ताबदल होणार हे ठरलेलं आहे आणि महाविकास आघाडीचं हे सरकार कधी आणि कसं पडणार हे अजित पवारांनाही माहीत आहे,’ असा गौप्यस्फोट केला आहे. आज ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
तसेच यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका करत, ‘अजित पवारांनी जास्त गमजा मारण्याची गरज नाही. कालचक्र हे कायम फिरत असतं. माणसानं नम्र राहून नीट बोलायला हवं. सरकार पडणार नसेल, तर ते इतका आकांडतांडव कशासाठी करत आहेत? असा सवाल केला आहे.
दरम्यान, या मतदारसंघासाठीचे विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान १७ एप्रिल रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि विरोधकांनी पंढरपुरात आपल्या प्रचारसभांनी निवडणुकीच्या मैदानात धुरळा उडवून दिला असून, पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.