कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्या अनुषंगानेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यांवर चकरा मारताना पाहायला दिसत आहेत. राज्यातील कोरोना स्थितीवरुन पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. पवारांची हीच नाराजी घेऊन राऊत मुख्यमंत्र्यांकडे गेले होते असं बोललं जात आहे. तसंच संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात पुन्हा सुसंवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टोला हाणलाय. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही पाटील यांनी पवारांवर टीकास्त्र डागलंय.
हे पण वाचा: पब डिस्को बारला सवलतीचा प्रसाद, मात्र गणेश उत्सव बंदिवासात!
शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करायला खूप उशीर केला. राज्याचं आर्थिक आणि वैद्यकीय क्षेत्राचं पूर्ण वाटोळं झाल्यावर प्रश्न मांडत आहेत. शरद पवार यांनी सरकारमध्ये जी भूमिका बजावायला हवी होती ती बजावली नाही. अंकुश ठेवण्याची त्यांची भूमिका हवी होती. ते आता नाराजी व्यक्त करत असतील तर खूप उशीर झाल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. मराठा समाज त्यांच्या गाड्यांच्या मागे धावला पण त्यांनी मराठा समाजाला काय दिलं? असा उपरोधिक सवालही पाटील यांनी विचारलाय.
हे पण वाचा: सार्वजनिक गणेशमुर्ती ४ फुटाची तर घरातील बाप्पा २ फुटाचा; यंदाही मुर्तीकारावर कोरोनाचे सावट
बंद पडणाऱ्या स्कुटरवर फिरणाऱ्यांची आज एवढी संपत्ती कशी?
सुरुवातीला ते कसे होते. त्यांची संपत्ती किती होती आणि आता त्यांची संपत्ती किती आहेत पाहा. बंद पडणाऱ्या स्कुटरवर फिरणाऱ्यांची आज एवढी संपत्ती कशी? मराठा समाजातील या नेत्यांनी कोणत्या तरुणाला डॉक्टर केलं का? इंजिनिअर केलं का? अशी प्रश्नांची सरबत्तीच चंद्रकांत पाटील यांनी केलीय. पुण्यातील आंबिल ओढा तोडक कारवाई प्रकरणात अजितदादांचा हात असल्याचे पुरावे द्या असं म्हणण्याची वेळ खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर येते यातच सगळं आलं, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.