मुंबई : राज्यात एकीकडे ऑक्सिजन आणि रेमेडीसीवर इंजेक्शन्सचा तुटवडा जाणवत असताना, दुसरीकडे काही दिवसांपूर्वी भाजपचे नगरचे खासदारखासदार सुजय विखे पाटील यांनी, अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा तुटवडा जाणवत असल्यामुळे, खाजगी विमान करून थेट दिल्लीतून रेमडेसीवीर इंजेक्शन्स आणून जिल्ह्यात वाटप केले होते.
दरम्यान, राज्यात तुटवडा असताना सुजय विखे यांनी गुपचूप केलेल्या या प्रकारामुळे, त्यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज खंडपीठाच्या न्यायाधीशांनी परखड मत व्यक्त केले असून, न्यायालयाने सुजय विखेंना कोरड्या शब्दात सुनावले आहे.
“तुम्ही जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी काम करता, तेव्हा त्या कामासाठी केलेला बेकायदेशीर मार्गाचा वापर हा कधीच शुद्ध नसतो, अशा शब्दांत न्यायमूर्ती घुगे यांनी सुजय विखेंची कानउघडणी केली आहे. तसंच, सुजय विखे यांनी रेमडेसीवीर इंजेक्शन विमानातून घेऊन आल्यानंतर व्हिडीओ चित्रित केला, हे नाटकी कृत्य करण्याची त्यांना कोणतीही आवश्यकता नव्हती. त्यांना हा दिखाऊपणा टाळता आला असता, असे परखड बोलही न्यायमूर्तींनी विखेंना सुनावले आहेत.
दुसरीकडे, सुजय विखे यांनी कोणतेही गुन्हेगारीचे काम केले नाही. रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. यासाठी लोकांची मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी विमानाने जाऊन रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा आणला आणि तो लोकांमध्ये वाटला होता, हा गुन्हा ठरू शकत नाही, असा युक्तीवाद सुजय विखेंच्या वकिलांनी केला आहे. तसेच सुजय विखे यांनी १२०० इंजेक्शनचे बॉक्स आणले होते, अशी देखील माहिती वकिलांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी ५ मे रोजी होणार आहे.