पुणे : महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये कंत्राटी पध्दतीने सुरक्षा पुरविण्यासाठी काढलेल्या निविदांमध्ये, भाजपशी संबंधित नेत्यांच्या जवळच्या ठेकेदारांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना दुसरीकडे कोट्यवधी रुपयांच्या निविदा कशासाठी काढण्यात येत आहेत?, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे ही प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक व माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी केली महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
अरविंद शिंदे यांनी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांकडे दिले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत शिंदे यांनी माहिती दिली़ ते म्हणाले की, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. शिवाय तज्ञांच्या म्हणण्यानुसार जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे, त्यानुसार प्रशासनाने पाऊले उचलने गरजेचे आहे. परंतू, ऐन कोरोनाच्या संकटामध्ये महापालिकेला कंत्राटी पध्दतीने दीड हजार सुरक्षा रक्षकांच्या पुरवठ्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यामध्ये या अटी-शर्ती घातल्या आहेत. शिवाय, त्या ठराविक कंपन्यांनाच मिळावी त्यादृष्टीनेच ठरविल्या घाट घातला आहे.
महापालिकेने काढलेली निविदा केवळ क्रिस्टल आणि सैनिक या दोन कंपन्या पात्र ठरतील, अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जात आहे. यामधील एक कंपनी मुंबईतील, तर दुसरी पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांशी संबंधित आहे़. दरम्यान, या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीने राज्य सरकारच्या नियमानुसार सुरक्षारक्षकांना वेतन दिले नसल्याने अद्याप त्या कंपनीची चौकशी सुरू आहे. असे असतानाही ही कंपनीही या निविदा प्रक्रियेत पात्र ठरली आहे, याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ही निविदा प्रक्रिया म्हणजे भाजपशी संबंधित नेत्यांच्या जवळच्या ठेकेदारांच्या घशात घालण्याचा घाट आहे, असे अरविंद शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.