मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे उत्तर दिलं. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी, असं राऊत म्हणाले.
खासदार संभाजी छत्रपती हे महाराष्ट्रातील सन्माननीय नेते आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचा संताप आणि भूमिका सरकारने समजून घेण्याची गरज आहे. सरकार समजूनही घेत आहे. संभाजीराजे सर्वांना भेटले. ते मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंना भेटले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनाही भेटले. मात्र सर्वात प्रमुख भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच असायला हवी. हा प्रश्न आता राज्याच्या हातात राहिला नाही. तो केंद्राच्या कोर्टात गेला आहे, असही संजय राऊत म्हणाले.