मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून रस्त्यावर उतरुन जेल भरो आणि चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान आले आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाला ४ महिन्यांत आरक्षण देईन अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा देत आहेत.
मात्र, याच फडणवीसांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपचे पाप आहे. फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत,” अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सचिन सावंत म्हणाले, “सत्ता मिळवण्यासाठी बेफाम आश्वासन द्यायची आणि नंतर त्या आश्वासनांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या ही फडणवीसांची कार्यपद्धती आहे. धनगर समाजाच्या मेळाव्यात त्यांना क्या हुआ तेरा वादा हे गाणे हे धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी उगाचच ऐकवले नव्हते. म्हणून जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण करण्याला भाजपाच जबाबदार आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळातच या जिल्ह्यात जिप गट आणि पंस गणाची रचना झाली होती.”
“फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयापेक्षाही अधिक शक्तीशाली झालेत का?”
“सत्ता मिळाल्यावर चार महिन्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवेन असे म्हणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयापेक्षाही अधिक शक्तीशाली झाले आहेत का? असा प्रश्न विचारून भारतीय जनता पक्ष स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी समाजा-समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे कोरोनाचा विस्फोट होईल याचीही तमा ते बाळगत नाही हे स्पष्ट आहे,” असे सावंत म्हणाले.
“भाजप नेत्यांनी विनंती करूनही केंद्रातील भाजप सरकारने 2 वर्षे माहिती दिली नाही”
“प्रशासकीय स्तरावर देखील जनगणना माहितीच्या संदर्भात जनगणना विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे. भाजप नेत्यांनी राज्यातील भाजप सरकारतर्फे विनंती करूनही केंद्रातील भाजप सरकारने गेले 2 वर्षे सदर माहिती दिलेली नाही. ही वस्तुस्थिती असताना भाजप आपले पाप महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची कोणतीही चूक नसतानाही भाजपतर्फे चाललेले आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला.