पुणे :शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मंचर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास अजित पवार यांनी देखील संबोधित केले. तसेच यावेळी अजितदादांनी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर केलेल्या विविध विकासकामांचा पाढाच वाचून दाखवला.
शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, अशी घोषणा अजितदादांनी यावेळी केली. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशाची सभा शिरुर लोकसभेसाठी ‘अमोल’ नाही तर ‘अनमोल’आहे, अशा शब्दात आढळराव पाटलांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केलं. आढळराव पाटलांना संसदेत पाठवत मोदींचे हात बळकट करा असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता अजितदादांच्या निर्णयावर लाखोंच्या फरकाने शिक्कामोर्तब करेल. शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करायचंय.शिवाजीराव आढळराव पाटील आणि आम्ही एकदिलाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी काम करु, असे आवाहन यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थितांना केले.
शिवाजीराव आढळराव पाटील विकासासाठी अजितदादा पवार यांच्यासोबत आलेत. जनताही लोकसभा निवडणुकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल, असा विश्वास महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केला.
शिरुरमध्ये अनेक पर्याय असतानाही उमेदवारी दिल्याबद्दल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादा पवार यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचा शब्दही आढळराव पाटलांनी पक्षप्रवेशावेळी दिला.
शिरुरमधील प्रश्न अमोल कोल्हेंमुळे नव्हे तर अजितदादा पवार यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागले. काम न करता वाटलेला संसदरत्न पुरस्कार घेऊन अमोल कोल्हे जनतेला फसवतात, अशी टीकाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. मला कोल्हेंसारखी फेकाफेकी करता येत नाही,असा टोलाही आढळरावांनी लगावला.
आमदार दिलीप मोहिते पाटील,आमदार अतुल बेनके यांनी आपले विचार व्यक्त करत शिवाजीराव आढळराव पाटील याचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.
यावेळी पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह शिरूर-आंबेगाव तालुक्यातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.