मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीन तास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. पश्चिम बंगाल निवडणूक, देशातील राजकीय परिस्थिती याबाबत या भेटीत सविस्तर राजकीय गूफ्तगू झाल्याचे सुत्रांनी सांगितले. बिगर भाजप सरकार केंद्रातील भाजप सरकार विरोधात संघर्ष करत आहेत. राज्यात महाविकास आघाडी बनवण्याचा यशस्वी प्रयोग शरद पवार यांनी केला होता. त्यामुळे २०२४ लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात का, त्यांची मोट कशी बांधता येईल? शरद पवार या सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणू शकतात का? याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर या भेटीला विशेष महत्व आले होते. भेटीनंतर त्यांनी एकत्र जेवण केलं अशीही माहिती आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी भाजप विरोधात जर आघाडी तयार करायची असेल तर ती कशी असली पाहिजे. त्याच्या तयारीसाठी ही भेट महत्वाची ठरू शकेल. प्रशांत किशोर यांनी याआधी नरेंद्र मोदी, पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग, बिहार मध्ये नितीश कुमार तर २०१९ विधान सभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर काम केलं आहे. त्यामुळे भाजपचे राजकारण, निवडणूक जिंकण्याचे डावपेच याचा प्रशांत किशोर यांचा दांडगा अभ्यास आहे. पुढच्या वर्षी देशात महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यात भाजपसाठी सगळ्यात महत्त्वाचं असणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशबरोबर पंजाब, उत्तराखंड, गोवा यासारख्या राज्यांच्या निवडणुका आहेत. या राज्यातही भाजप विरोधात आघाडी करता येऊ शकते का?, याची रणनिती आखल्याची माहिती कालच्या भेटीतून समोर येत आहे.
भाजप समाजातल्या प्रत्येक घटकांवर आणि प्रसंगावर भाष्य करते. कोणाला पटो न पटो भूमिका घेते. समाजाच्या दोन वाटण्या करायच्या आणि एक वाटा काँग्रेसला देऊन त्यावरून काँग्रेसची बदनामी करायची ही रणनीती भाजपने आखली आहे. देशपातळीवर विचार करताना विरोधकांकडे आश्वासक चेहऱ्याची गरज आहे. त्यासाठी सामूहिक नेतृत्व पुढे आणावे लागेल. राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असे चित्र पुढे येऊ नये यावरही बैठकीत विचारविनिमय झाला. ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रप्रदेशचे जगनमोहन रेड्डी आणि तेलंगणाचे चंद्रशेखर राव हे तिघे आजही मोदीविरोधी ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. यासाठी जगन मोहन रेड्डी यांच्याशी प्रशांत किशोर बोलतील. बाकी दोघांची स्वतः शरद पवार यांनी बोलावे अशी चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होत असताना, त्यांच्याकडून फारशी हालचाल होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी थेट संपर्कावर भर द्यावा लागेल. लोकांमध्ये थेट जावे लागेल. तरच भाजपने तयार केलेले पर्सेप्शन बदलू शकते, असे मत प्रशांत किशोर यांनी बैठकीत मांडले. भारताचा विचार करता कमी शिक्षित भागात आणि एससी आणि एसटीसाठी राखीव मतदारसंघांमध्ये भाजपला जास्त मतदान झाल्याची आकडेवारी किशोर यांनी सांगितली.
एकूणच भाजप विरोधात निवडणुकीच्या रणनीतीमध्ये मात देणारा म्हणून प्रशांत किशोर यांचा चेहरा आहे. त्यांनी भाजप विरोधात सरकार स्थापन करण्याचा प्रयोग करणाऱ्या शरद पवार यांची भेट घेतल्यामुळेच राजकीय वर्तुळात ही भेट चर्चेत आली आहे.