दक्षिण-मध्य रेल्वेच्याअकोला ते खंडवा गेज परिवर्तनाचे काम मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या मीटरगेज मार्गावर न करता त्यासाठी या अभयारण्याबाहेरच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे मंगळवारी लिहिलेल्या एका पत्राद्वारे केली आहे.
अकोला ते खंडवा या एकूण १७६ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा ३८ किलो मीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किलोमीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने ब्रॉडगेज परिवर्तनाच्या कामाचा कधीही भरून न निघणारा परिणाम आधीच नामशेष होत असलेल्या वाघ व त्यांच्या अधिवासावर होईल. त्यामुळे गेज परिवर्तनासाठी या व्याघ्र प्रकल्पाबाहेरून जाणाऱ्या पर्यायी मार्गावर भर देणे योग्य राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
अकोला-खंडवा गेज परिवर्तनाच्या कामात केवळ गेज परिवर्तनच नव्हे, तर सध्या अस्तित्वात असलेल्या मीटरगेज मार्गावरील धोकादायक वळण सरळ करणे व बोगद्यांचाही समावेश आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या २३.८ किमी मार्गावरील अति तीव्र वळण सरळ करण्याचे काम म्हणजे नव्याने रेल्वेमार्ग टाकण्यासारखेच होईल, या मुद्याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे