मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांवर निशाणा साधला आहे. नीलमताई गोऱ्हे, सुप्रियाताई सुळे, यशोमतीताई ठाकूर हरवल्या आहेत. कृपया कुणाला दिसल्यास सांगावे. ही माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांवर टीका केली आहे.
तसेच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे माहिती देवून सहमतीने शरीरसंबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले असल्याचे कबुली दिल्यामुळे “एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली” असा संदेश जनतेमध्ये जात आहे, जो पुढील दृष्टीने चुकीचा आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
रेणू शर्मांनी दिलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून, तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच रेणू शर्मांविरोधात जर कोणी तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने तातडीने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून मुंडे यांची हकालपट्टी करावी, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.