मुंबई : राज्याच्या गृहमंत्र्यांनी काल नैतिक जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल्यानंतर, महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला असून, त्यांनी यावर कार्यवाही करताच अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावरून पायउतार झाले, हे निश्चित होईल. यामुळे या रिक्त झालेल्या गृहमंत्री पदाची सूत्रे तूर्तास मुख्यमंत्र्यांकडे असली, तरी या पदाचा कार्यभार लवकरच दिलीप वळसे पाटील घेणार आहेत. कालच या पदासाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाची निश्चिती करण्यात आली.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील सध्या कामगार मंत्रिपद व उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. वळसे पाटलांच नाव गृहमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याने शरद पवारांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे आणखीही काही निर्णय घेतले आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त भार सोपवला आहे, तर वळसेंकडील कामगारमंत्री पद, ग्रामविकास मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांना सोपवण्यात आले आहे.
मंत्रिमंडळात हे खांदेपालट होत असतानाच, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने, सगळ्यांचे डोळे मोठे झाले. परंतु, उदयनराजे भोसले याठिकाणी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वायफळ सुरु झालेल्या चर्चांना लगेचच विराम मिळाला.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, “मी साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.” यावेळी त्यांना अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. मात्र, त्यावर बोलण्यास उदयनराजे भोसले यांनी नकार दिला.
काही दिवसांपूर्वी माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी ‘लेटरबॉम्ब’ टाकत अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी होणार आहे. ऍड.जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी देत १५ दिवसात अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी अनिल देशमुखांनी राजीनामा दिलेला आहे.