मुंबई : म्हाडाच्या १०० सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नाराज असल्याच्या चर्चेला उधान आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हाडांची नाराजी दुर करण्यात २४ तासात यश आले आहे.
कॅन्सर रुग्णांना म्हाडाची घरे देण्यास स्थानिकांचा विरोध असल्याची तक्रार शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. मात्र, शरद पवारांच्या उपस्थितीतील निर्णय तडकाफडकी रद्द केल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले.
दुसरीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात वितुष्ट आल्याच्या चर्चा रंगू लागल्या. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सोयीसाठी बॉम्बे डाइंगमध्ये १०० सदनिका आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे स्वतः आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सांगितल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.
‘मला मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले व त्याच परिसरात दुसरी जागा शोधून तातडीने निर्णय घेण्याची सूचना केली. बॉम्बे डाइंगमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय अवघ्या १५ मिनिटांत घेण्यात आला’, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नाही. विसंवाद असता तर २४ तासांच्या आत निर्णय झाला नसता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार अजय चौधरी यांच्यात पत्रात काय म्हटलंय?
शिवडी विधानसभा मतदारसंघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता सोसायटी या पुर्नरचित इमारतींमध्ये ७५० मराठी कुटुंब राहतात. सदर इमारती पुर्नविकसित करण्यात येत असल्याने म्हाडा प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या सदनिका रहिवाशी व संक्रमण शिबिरातील रहिवाशी यांना कायम स्वरुपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका त्यांना वितरीत न करता कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला. त्यामुळे या कुटुंबाने चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.