मुंबई : काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती, करोना परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर राज्यात शांततेत साजरी झाली. राज्यातील सर्व प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी, तसेच नागरिकांनी साधेपणाने बाबासाहेबांना अभिवादन करून, जयंतीमुळे राज्यात कुठेही करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतलेली पाहायला मिळाली.
याच निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेसच्या वतीने देखील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी, दूरदृश्य प्रणालीद्वारे सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही अभिवादन सभा झाली.
या दूरदृश्य सभेच्या आधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील जिल्हा, तालुका, ब्लॉक स्तरावर हा ‘रक्तदान सप्ताह’ सुरू राहणार आहे. तसेच या माध्यमातून राज्यभरात २ लाख रक्त पिशव्या संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
दरम्यान, या सभेला राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक प्रमुख पाहुणे, तर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे प्रमुख नेते सहभागी झाले होते.
यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून राज्यकारभार सुरू आहे. मागील काही वर्षांत दलित, अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढले आहेत. माध्यमांनाही बोलण्याची मोकळीक नाही. सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग वाढला आहे, असे म्हणत नाव न घेता केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
तसेच त्यांनी, सरकारच्या विरोधात काही बोलले की, चौकशी लावली जाते. अन्यायाविरुद्ध आंदोलन केले तर बदनाम केले जाते. आता लोकशाही व संविधान रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आली आहे. ‘अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते,’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द आज खरे ठरत आहेत, असे म्हणत केंद्र सरकारच्या कारभारावर शाब्दिक हल्ला चढवला.