काही दिवसांपुर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी राजकीय आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती. व्होट बँकेचे राजकारण सत्ता जाण्याच्या भीतीने हे आरक्षण रद्द करण्याची कोणत्याच राजकीय पक्षात धमक नसल्याचे ते म्हणाले होते. आता या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांच्यात जुंपली आहे.
हे आरक्षण रद्द केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आठवले यांनी दिला आहे. आठवले म्हणाले की, दलित आदिवासींसाठी असणारे राजकीय आरक्षण कुणाला नको हवे असेल तर त्याने त्याच्या पुरते ते नाकारावे, ज्याला नको असेल त्याने राजकीय आरक्षण घेऊ नये.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासींना सामाजिक, शैक्षणिक आरक्षणासोबत राजकीय आरक्षण ही संविधानात अंतर्भूत केले. त्यामुळे राजकीय आरक्षण हा दलितांचा घटनात्मक अधिकार आहे. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. दलितांचे राजकीय आरक्षण हिरावून घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असे आठवले म्हणाले.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातीला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे म्हणून हे आरक्षण ठेवण्यात आले होते. त्यानंतर 1954 मध्ये स्वत: बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाची तरतूद काढून टाकण्याची मागणी केली होती. राजकीय आरक्षणाची गरज नसल्याचे बाबासाहेब म्हणाले होते, असा दावाही आंबेडकर यांनी केला होता.