मुंबई : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ आणि सुरु असलेली लॉकडाऊन चर्चा, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी तूर्तास तरी लॉकडाऊन केला जाणार नसला, तरी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्यातील, विरोधी तसेच सत्तेत असलेल्या पक्षांनीही याला विरोध दर्शवला.
दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना, ‘उद्धवजी, समस्या अशी आहे की; लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. याआधी जे लॉकडाऊन होते, ते रुग्णालये किंवा आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी केले गेले होते. त्यामुळे यावेळेस त्यावरच पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया’, असा सल्ला ट्विट करत दिला होता.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमधून, नाव न घेता महिंद्रांना नुसते सल्ले देण्याचे ‘उद्योग’ नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असा टोला लगावला होता. मुख्यमंत्र्यांनी लगावलेल्या या टोल्यानंतर मनसे, भाजपा यांनी मुख्यमंत्र्यानावर यावरुन टीका केली होती. पण, आनंद महिंद्रा यांनी सोमवारी एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. महिंद्रा यांनी CMO Maharashtra च्या ट्विटर हॅन्डलला टॅग करून, लिहिले आहे की, ”पूर्णपणे लॉकडाऊन न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो. अथक परिश्रम करणाऱ्या दुकान मालकांबद्दल मला वाईट वाटते. आता कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. जेणेकरून ही निर्बंधही लवकरात लवकर उठवली जातील.”
Thank you @CMOMaharashtra for not imposing a total lockdown. My heart goes out to shop owners who face continuing hardship. It’s now our responsibility to strictly follow Covid protocols so that these restrictions can be lifted sooner rather than later https://t.co/aphiwobiRy
— anand mahindra (@anandmahindra) April 5, 2021
दरम्यान, राज्य सरकारने रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी हे धोरण अवलंबत, कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. राज्यात यापुढे ‘ब्रेक दी चेन’ या नावाने ही नवी नियमावली लागू होईल. या नियमावली अंतर्गत राज्यात, १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी असेल. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. तसेच शनिवार-रविवारी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. या अनुषंगाने सोमवार (५ एप्रिल) रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत, या नवीन करोना प्रतिबंधक नियमांची अंमलबाजवणी केली जाणार आहे.