मुंबई : देशभरात चर्चेत असणाऱ्या पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. पाच राज्यांपैकी केवळ एकाच राज्यात भाजपला स्पष्ट सत्ता मिळाली असून, इतर राज्यांमध्ये भाजपला फारसं यश मिळालं नाहीये.
दरम्यान, या पाच राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी उडाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक भाकित वर्तवलं होतं. यात त्यांनी, इतर चार राज्यांच्या तुलनेत आसाममध्ये भाजप सत्ता राखेल, तर इतर राज्यांमध्ये दुसरे पक्ष विजयी होतील, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता निवडणुकांच्या निकालानंतर पवारांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून, पाच पैकी एकाच राज्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर इतर राज्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर आणि केरळमध्ये खातंही उघडता आलं नाहीये.
दुसरीकडे, संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या प. बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने, भाजपचा दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. प.बंगालमध्ये भाजपनं आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र तिथे भाजपाला केवळ ७७ जागाच मिळाल्या, तर दुसरीकडं ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त २१२ जागा मिळाल्या आहेत.