मुंबई : सर्वोच्च न्यालयाने, राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करत, महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का दिला. यावरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, यावरून आज साताऱ्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाला सोडून सगळ्यांना आरक्षण दिलं जातं आणि यावर विविध पक्षातील ज्येष्ठ नेते, तसेच लोकप्रतिनिधी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत, यांना जनतेने मतदार संघात फिरु देऊ नये, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“कोणत्याही समाजाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने मी देखील नाराज आहे. मला न्यायालयाबद्दल आदर आहे, पण मराठा समाजातील पाच टक्के आमदार-खासदार आणि काही सधन सोडल्यास, इतर व्यक्तींना आरक्षणाची गरज आहे. तो त्यांचा हक्क आहे.’ असे ते म्हणाले.
न्या. अशोक भूषण, न्या. एल. नागेश्वरराव, न्या. एस. अब्दुल नाझीर, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या.एस. रवींद्र भट यांच्या घटनापीठाने हा निर्णय देताना, मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा रिपोर्ट याच्यातून, तसेच इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचा उल्लेख करत, मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं सांगत, मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय दिला.