मुंबई : राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड भार पडत असून, परिणामी रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसीवर आणि इतर औषधांसाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच राज्यात करोना साथीने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत असून, दुसरीकडे ऑक्सिजन अभावी देखील अनेक करोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
दुसरीकडे राज्यातल्या करोना परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातही राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले जात असून, शनिवारी ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा जाब विचारण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि काही नेते, हे विलेपार्लेच्या बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते. यावरून सध्या राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाही आहे, असा आरोप केला होता. यावरून आज भाजपच्या काही नेत्यांनी राज्यपालांना भेटून, नवाब मलिक यांनी खोटा आरोप केला असून, त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोक महाराष्ट्र सोडून चालले आहेत, असे सांगत मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी, देशात नवा मोदी कायदा आलाय की काय, अशी विचारणा केली आहे. तसेच देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. पण, काही पक्षाना राजकारण करण्याशिवाय काहीच काम नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लबोल केला आहे.
देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे गंभीर संकट ओढवले असताना काही लोक राजकारण करत आहेत. राजीनामा मागत आहेत. पोलिसात तक्रार करत आहेत. राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यामुळे देशात मोदी ॲक्ट आला आहे का? आणि या कायद्याचे अधिकार महामहीम राज्यपाल महोदयांना देण्यात आले आहेत का? – @nawabmalikncp pic.twitter.com/cEi1H1coxI
— NCP (@NCPspeaks) April 20, 2021
एकीकडे सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपने केला आहे, तर दुसरीकडे भाजप नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.