मुंबई : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. दर दिवसाला राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या ६० हजारांवर जात आहे. परिणामी आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. अशा हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, लसींच्या कमतरतेमुळे राज्यभरात रुग्णांचे हाल होत असून, यावरून राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दुसरीकडे बीड जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी लसींच्या अभावामुळे लसीकरण कार्यक्रम ठप्प करावे लागल्याने, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोगयमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहून अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
पत्रात त्यांनी, बीड जिल्ह्यात सध्या करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ७२९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण बाधित ३४ हजार ९८९ रुग्णसंख्येपैकी ३० हजार ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीनं रुग्णांना मदत करण्यासाठी दिवसरात्र झटत असताना, दुसरीकडे करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा मात्र मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, यामुळे करोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसींचा पुरवठा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. परिणामी रुग्णसंख्या वाढत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे या प्रकरणात जातीने लक्ष घालून, रेमडेसिवीर इंजेक्शन बीड जिल्ह्याला उपलब्ध करून द्यावेत, असे म्हणत त्यांनी नकळतपणे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंची अकार्यक्षमता दाखवून दिली आहे.
त्यांनी बीड जिल्ह्याला करण्यात आलेल्या असमतोल आणि अपुऱ्या लसींच्या पुरवठ्याचा राज्य सरकारकडे पत्रातून निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या २ लाख लसींपैकी, बीडला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत, ही अतिशय खेदजनक बाब आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून, पुरेशा लसी उपलब्ध करून द्याव्यात आणि तशी व्यवस्था करण्यासाठी संबधित यंत्रणेला सूचित करावे, अशी मागणी देखील पंकजा मुंडे यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पुढचे १५ दिवस आणि रात्र राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे. मात्र या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.
#REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीड ला ही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत. pic.twitter.com/30Bi8lu7mj
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 15, 2021