मुंबई : राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून १ मेपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच सोबत काही कडक निर्बंध देखील राज्यभरात लागू केले आहेत. तरीही राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, करोना साथीने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात भर यतेत असून, राज्यात अजूनही बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसीवर इंजेक्शन्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन राज्यातील निर्बंध आणखी कडक केले आहेत. याबाबतचं अधिकृत पत्रक राज्य शासनानं जारी केलं असून, राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुसरीकडे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली असून, यानंतर प्रसार आणि समाज माध्यमांची संवाद साधताना मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनी राज्यात १५ दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. तसेच राज्यात जिल्हाबंदीची देखील शक्यता मंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवली आहे. या संपूर्ण लॉकडाऊनच्या निर्णयाचा सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम होईल असे संकेत देखील मंत्र्यांनी दिले आहेत.
तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर १० वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेला असून, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मात्र होणार असल्याची स्पष्ट कल्पना शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या आदेशानंतरही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसून रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकार या निर्णयाप्रती आल्याचे मंत्र्यांचे म्हणणे आहे. याबाबत उद्या मुख्यमंत्री राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या बाबतची नवीन नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल आणि मुख्यमंत्री अधिक स्पष्टीकरण देतील, असे मंत्री अस्लम शेख आणि राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.