मुंबई : सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर करोनामुळे परिस्थती हाताबाहेर गेली आहे. प्रत्येक दिवसाला देशात दोन लाखांच्याहून अधिक करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. तसेच देशात सगळीकडेच बेड्स, ऑक्सिजन सोबतच रेमेडीसीवर या करोना रोगावर गुणकारी असणाऱ्या इंजेक्शन्सचा देखील तुटवडा असून, यावरून महाराष्ट्रात देखील राजकारण चांगलचं तापलेलं आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडीमधले नेते आणि विरोधक यांच्यात टीका आणि आरोप प्रत्यारोपांची चांगलीच जुगलबंदी चालू असून, दुसरीकडे मात्र करोना बाधित रुग्णांचे हाल होतानाचे विदारक चित्र पाहायला मिळत आहेत.
यावरूनच बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. मला जर करोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी फडणवीसांच्या नावाचा उल्लेख करत केले आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानाचा भाजप नेत्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
बोलघेवड्यांनी वायफळ बडबड न करता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करावा !शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त आहेत, यात आता कसलीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता गायकवाड, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तसेच, त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर, केंद्राने दिलेली भरमसाठ मदत राज्य सरकारला योग्यरित्या वापरताच आली नसल्याचा आरोपदेखील केला आहे.
तसेच, राजकारण हे राजकारणासारखं असावं. अपशब्द वापरणं, नेत्यांना चुकीच्या नावाने संबोधणं, असं राजकारण आम्ही करत नाही. मात्र स्वतःची राजकीय पातळी सोडून जर भाजप नेत्यांवर पुन्हा टीका केली, तर मोबदल्यात तुम्हालाही चपराक मिळेल, एवढं लक्षात असावं. असं म्हणत त्यांनी, टीका करण्यापेक्षा लसीकरणावर भर द्या. राज्य संकटात आहे, त्यावर तोडगा काढा, असा सल्ला देखील ठाकरे सरकारला दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात काल ६७ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे, तर ५६ हजार ७८३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. काल राज्यात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.