मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महामारीच्या दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या वाढ होत असताना, मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांचे सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं. तसेच, पालिकेने व्यवस्थापन कसे केले, याचे पालिका अधिकाऱ्यांकडून धडे घेण्याची सूचना देखील सुप्रीम कोर्टाने केंद्र तसंच दिल्ली सरकारला केली.
दरम्यान, यावरूनच आज प्रसारमाध्यांशी बोलताना शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी, “सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं असून मुंबई महापालिकेकडून शिका असं सांगितलं आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राकडून शिका सांगितलं आहे. देशाला महामारीशी लढायचं असेल, तर महाराष्ट्र मॉडेलचा वापर करावा असं मी सातत्याने सांगत आहे. महाराष्ट्र मॉडेलचा वापर केला नाही, तर देशातली महामारी नियंत्रणात येणार नाही,” असा सल्ला वजा इशारा संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
तसेच, “मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रकारे राज्य महामारीशी लढत आहे, त्याची दखल अनेक राज्यं, अनेक उच्च न्यायालयं आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली आहे. मात्र, दुसरीकडे ज्याप्रकारे केंद्रीय आरोग्यमंत्री आणि विरोधक महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेवर टीका करत होते, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने मारलेली ही चपराक आहे,” अशी टीका देखील संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.