केंद्र सरकारच्या नवीन शेती विधेयकांवरून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातून देखील राज्यमंत्री बच्चू कडू रवाना झाले आहेत. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा ताफा रोखला आहे. बच्चू कडू यांना देशभरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. त्यामुळे त्यांना अडवल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी दिल्लीच्या दिशेने निघालेला बच्चू कडू यांचा ताफा धौलपूर सीमेवर रोखला.
काही दिवसांपूर्वी राज्यातून निघालेला राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा ग्वाल्हेरहून पलवल येथे जाण्यासाठी निघाले. भरतपूर मार्गे ते पलवल येथे जात होते. पण याआधीच उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. चक्का जामचे कारण देत त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. परंतु त्यांना पर्यायी मार्गाने जाण्यास सांगितले. मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी आंदोलनाने बिथरलेल्या सरकारने दिल्लीला जाणाऱ्या सर्व मार्गांवर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
उत्तर प्रदेशातील पोलिसांनी आता दडपशाही सुरू केली असून दिल्लीत जाता येऊ नये म्हणून सर्व मार्गावर पोलिसांनीच चक्का जामच्या नावाखाली बंद केला आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. पोलिसांनी अडवल्यानंतर बच्चू कडू यांनी आपला मुक्काम भारतपूरमध्येच केला. त्यानंतर आता ते पलवलला रवाना होतील अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे बच्चू कडू कोणत्या पर्यायी मार्गाने दिल्लीला दाखल होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, नवीन शेतकरी कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध सुरूच असून हे कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु केंद्र सरकारने हे कायदे रद्द न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकरी आणि केंद्र सरकारमधील हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा,उत्तराखंड , उत्तरप्रदेशसह अनेक राज्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी असून विविध चर्चा झाल्या परंतु यावर अजूनही तोडगा निघालेला नाही .