मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी, सरकारने राज्यात ५ एप्रिलपासून नवे करोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना, केंद्र सरकारकडून होणाऱ्या लसींच्या पुरवठ्याबाबत देखील समाधान व्यक्त केले होते.
दुसरीकडे मात्र, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज करोनाच्या लसीकरणासंदर्भात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, करोनाच्या लसीकरणाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र अव्वल असला, तरी हवा तसा पुरवठा केंद्राकडून केला जात नसल्याचं सांगत, लसींच्या पुरवठ्या संदर्भात केंद्रावर संताप व्यक्त केला.
देशात लसीकरणाच्याबाबतीत महाराष्ट्र नंबर एकचं राज्य ठरत आहे. त्यामुळे राज्याची गरज लक्षात घेता केंद्रानं, महाराष्ट्राला दर आठवड्याला करोना लशीचे ४० लाख डोस पुरवावेत अशी मागणी टोपे यांनी केली आहे. तसेच, राज्यात १४ लाख इतकाच लशीचा साठा शिल्लक असून, तो तीन दिवसांत संपेल. त्यामुळे केंद्रानं तातडीने याची नोंद घेऊन, ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर लस राज्यांना द्यायला हवी. असं राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, करोनाची परिस्थिती ही न दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे करोना संदर्भातील कुठल्याही गोष्टींना घेऊन, कोणत्याही बाबतीत राजकारण करण्याची ही वेळ नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसं आवाहन केलं आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास समर्थन दिलं आहे. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून राजकारण्यांनी राजकारण करू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.