मुंबई : मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात वातावरण तापले आहे . मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्याने मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यावरून शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नाशिकमधील शासकीय विश्रामगृहावर सोमवारी मेटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.’काही मंत्री आरक्षण मिळू नये म्हणून काम करत असून उद्धव ठाकरे हे शब्द न पाळणारे मुख्यमंत्री आहेत, तसेच आरक्षणाला शिवसेनेचा पहिल्यापासून विरोध असल्याने मंत्रिमंडळात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मंत्र्यांची लॉबिंग सुरु असल्याचा आरोप मेटेंनी केला आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थिगिती दिल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. या बैठकीतून मार्ग काढू असे, आश्वासन दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे हे वचन पाळणारे नाहीत. बाळासाहेब ठाकरे एकवचनी होते; मात्र, त्यांचे वारसदार शब्द पाळत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. मराठा समाजाच्या मागण्यांवर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, सरकार शब्द देऊनही पाळणार नसेल तर, आंदोलनाची धार तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
Read Also :