मुंबई : कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला भाजपने विरोध दर्शवला होता. आता केंद्र सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा काल निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मात्र भाजपाकडून स्वागत करण्यात येत आहे. या विसंगत भूमिकेवरून राज्याचे उच्च व तत्रंशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग आणि तिसऱ्या लाटेच्या उद्रेकाच्या भीतीमुळे सलग दुसऱ्या वर्षी अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना फटका बसला आहे. करोना परिस्थितीचा आढाव घेत राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर भाजपाने कडाडून टीका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतरही भाजपाच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारच्या न परीक्षा घेण्याचा धोरणांवर टीकास्त्र डागलं होतं.
काल (१ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या बैठकीत सीबीएसई बोर्डाच्या १२वी इयत्तेच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचं राज्यातील भाजपा नेत्यांनी स्वागत केलं. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचं भाजपा नेत्यांकडून स्वागत झाल्यानंतर राज्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून चिमटा काढला.
आम्ही अंतिमवर्षाच्या परीक्षा रद्द केल्या तेव्हा जोरदार विरोध केला. आता केंद्र सरकारने १२वी CBSE परीक्षा रद्द केल्या तर स्वागत करत आहात. असो..केंद्र सरकारने १२वी CBSE विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द केल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. जय महाराष्ट्र!,” असा टोला सामंत यांनी लगावला आहे. बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पर्यायी पद्धतीने दिलेला निकाल मान्य नसेल किंवा परीक्षा देण्याची इच्छा असेल, त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.