मुंबई : एकीकडे देशात दिवसाला सापडणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या तब्ब्ल २ लाखांच्याही वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य सोयी-सुविधांचा तुटवडा जाणवत असून, करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी रेमेडीसीवर इंजेक्शन्सचा, रुग्णवाहिकांचा, ऑक्सिजन सिलेंडर आणि बेड्सचा अभाव असल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसून येत आहेत अशी विदारक परिस्थिती असताना, दुसरीकडे मात्र उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यातच आता कुंभमेळ्यात झालेल्या लाखो भाविकांच्या गर्दीमुळे सहाजिकच हजारो जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. अनेक साधु-संतांसह भाविकांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. काही आखाड्यांनी कुंभमेळ्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला आहे.
यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली असून, अनेक सवाल त्यांनी सरकारला विचारले आहेत. तसेच देशाची सामान्य जनता देखील यावरून समाज माध्यामांवर संतप्तपणे व्यक्त होत असून, देशात हा एवढा मोठा विरोधाभास असूनही या लाखो भाविकांवर कारवाई का नाही, असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जात आहे.
दरम्यान, कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेल्या संसर्गाच्या संकटाची गंभीर दखल घेत पंतप्रधान मोदींनीही, आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून, करोनाच्या वाढत्या संकटामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक रूपातच साजरा करावा, असे आवाहन केल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.
तसेच पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाबाबत प्रतिक्रिया देताना महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांनी, माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. स्वत:च्या आणि इतरांच्या जीविताचे रक्षण करणे हे महापुण्याचे काम आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन धर्मपरायण जनतेने नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करत, “बरं झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. हेच जर दुसरं कोणी केलं असतं, तर त्याला हिंदूद्रोही ठरवलं असतं. कालपर्यंत 49 लाख लोकांनी स्नान केलं आहे. कोलकातापर्यंत जाणारी गंगा किती करोना घेऊन कुठपर्यंत जाईल, याची माहिती नाही” असं निरुपम यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी निरुपम यांनी “कुंभमेळा तत्काळ समाप्त करायला हवा” असं आवाहन देखील स्वामी अवधेशानंद गिरी यांना केलं आहे.
शुक्र है प्रधानमंत्री मोदी ने कुंभ समाप्त करने की अपील की।
और कोई करता तो उसे हिंदू द्रोही कह दिया जाता।
कल तक 49 लाख लोग स्नान कर चुके हैं।
कोलकाता तक जाने वाली गंगा पता नहीं कितने #कोरोना लेकर कहाँ तक ले जाएगी।
कुंभ तत्काल संपन्न होना ही चाहिए।@AvdheshanandG से सादर निवेदन है।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 17, 2021
शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात देखील गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३० हजारांच्यावर नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ कोटी ४५ लाखांवर पोहोचली असून, करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७५ हजार ६४९ वर पोहोचला आहे. देशातील करोनाग्रस्तांपैकी १६ लाख ७९ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.