पुणे: आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबंध? मी सांगितलेली विकासकामे ऐकत नाहीत, आणि अशी कामे लगेच ऐकतात का? असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील बैठकीत मंगवारी केला. आंबिल ओढ्यालगत सीमाभिंती उभारणीबाबतच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून येत्या शुक्रवारी निर्णय घेऊ, असेही पवार यांनी सांगितले.
पुणे शहरातील विविध प्रश्न, त्यावरील अंमलबजावणी अडथळे आणि उपाय यावर पवार यांच्या उपस्थितीतील मुंबईत बैठकीत चर्चा झाली. तेव्हा बैठक सुरु होताच आंबिल ओढ्याभोवती सीमाभिंत बांधण्याचा विषय आला. त्याचवेळी महापालिकेने गेल्या आठवड्यात केलेल्या येथील कारवाईचा संबंध नसल्याचे पवार यांनी जाहीर केले. या कारवाईमागे पवार यांचा हात असल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याची चर्चा होती. त्यानंतर आंबिल ओढयाभोवती सीमाभींत का बांधली जात नाही, याची विचारणा करीत पवार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली. त्यावर लोकप्रतिनिधींची भूमिका घेऊन आणि नगरविकास खात्याचे सचिव महेश पाठक यांच्याशी पवार यांनी सल्लामसलत केली.
पवार म्हणाले, ‘‘पावसाळ्यात आंबिल ओढ्याला पुराचा धोका असल्याने सीमाभिंत बांधण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी त्यातील नेमकी कार्यवाही करण्यासाठी पुण्याचे महापौर आणि महापालिकेतील अन्य पदाधिकान्यांशी चर्चा केली जाईल. तेव्हा निर्णय करू.’’ सीमाभिंत बांधण्याचा ठराव झाला तरी, महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याकडे आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, सचिन दोडगे, विरोधी पक्षनेत्या दिपाली घुमाळ, नगरसेविका आश्विनी कदम यांनी पवार यांचे लक्ष वेधले.
तर मी अजितदादांची तक्रार करेन – सुळे
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबील ओढ्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. ‘जर अजित पवार यांच्या आदेशाने ही कारवाई झाली असेल तर पुरावे द्या, मी तुमच्या वतीने त्यांची तक्रार करेन, अशी रोखठोक भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली होती. पुणे महापालिकेच्या गेटवर आंदोलन करत असलेल्या आंबील ओढ्याच्या कारवाईत बाधित झालेल्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. सुमारे तासभर सुप्रिया सुळे या रस्त्यावर या बाधित कुटुंबीयांच्या सोबत जमिनीवर खाली बसल्या होत्या. ‘तुमच्यावर झालेल्या कारवाईबद्दल ज्यांना कुणाला जाब विचारायचा असेल त्यांच्याकडे आपण तुमच्या सोबत येऊ’ असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले. मात्र, कुटुंबीयांनी आक्रमक होत सुप्रिया सुळे यांच्यासमोर थेट अजित पवार यांचं नाव घेऊन आरोप केला.