पंढरपूर : महाराष्ट्रात सध्या पंढरपूर पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यातल्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी पंढरपुरात आपला तळ ठोकला असून, प्रचारसभांचा धुरळा निवडणुकीच्या मैदानात उडत आहे.
आज पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांच्यावर, ‘मी कच्चा गुरुचा चेला नाही,’ असं म्हणत नाव न घेता शरंसधान साधलं.
तसचं कोणाचीही पावसात सभा झाली की यांना धसकी भरते. मी कासेगावच्या सभेत देखील सांगितले होते, कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका. पण यांना नाद केल्याशिवाय रहावत नाही. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं पवार साहेबांनी करुन दाखवलं, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, ‘भाजपनं इथलं राजकारण खालच्या पातळीवर नेले आहे. पोटनिवडणूक लागल्यावर विरोधात उमेदवार देण्याचं पाप यांनी केलं. मोठ्या संख्येने करोनाचे पेशंट समोर येत असताना, त्यांनी ही निवडणूक लावायला नको होती. वारकरी संप्रदायात या गावाचं वेगळं स्थान आहे. त्यामुळे 17 तारखेला वळवळ करणाऱ्याला चांगलं रिंगण दाखवायचं आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना स्पष्ट इशारा दिला.
मुंडे भाषण ऐन रंगात आलं असतानाच नमाज सुरू झाली आणि तातडीने मुंडे यांनी आपलं भाषण थांबवलं. नमाज संपेपर्यंत ते स्तब्ध माईकजवळ उभे उभे होते आणि नमाज संपल्यावर त्यांनी, ‘तुमचं सरकार असताना पाच वर्षे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी घसा कोरडा करावा लागला. आमचं सरकार येताच आम्ही कर्जमाफी केली, असं सांगत, ‘प्राचीन इतिहासात भगीरथनेच गंगा आणली होती. आता या 35 गावातही भगीरथच पाणी आणेल, असं म्हणत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे. पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.