पुणे: पुण्यातील आंबील ओढ्याच्या कारवाई प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही उडी घेतली आहे. पुणे महापालिकेला लाज वाटली पाहिजे, माझ्या नागपुरात अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो’ असं नितीन राऊत म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना नितीन राऊत यांनी आंबील ओढा परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागू होता. शेकडो लोकांचा रोजगार बुडाला आहे. अशा या बिकट परिस्थिती गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना पुणे महापालिकेला लाज वाटली पाहिजे. महापौर काय झोपा काढत होते का? असा सवाल विचारत राऊत यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली.
पावसाळ्यात, महामारीच्या काळात कारवाई केली. महिलांचे केस ओढले, या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी, माझ्या नागपुरात जर अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो, अशी मागणीही राऊत यांनी केली. आंबील ओढ्यात बिल्डर अजित ओव्हर यांच्या जवळचा पालकमंत्र्यांनीच तोडकाम कारवाई न थांबवण्याचे आदेश दिले असा आरोप होत आहे, असं पत्रकारांनी विचारलं असता, याला ‘पुणे पालिकाच जबाबदार आहे’ असं सांगत राऊत यांनी काढता पाय घेतला
तर मी अजितदादांची तक्रार करेन – सुळे
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबील ओढ्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. ‘जर अजित पवार यांच्या आदेशाने ही कारवाई झाली असेल तर पुरावे द्या, मी तुमच्या वतीने त्यांची तक्रार करेन, अशी रोखठोक भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली होती. पुणे महापालिकेच्या गेटवर आंदोलन करत असलेल्या आंबील ओढ्याच्या कारवाईत बाधित झालेल्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. सुमारे तासभर सुप्रिया सुळे या रस्त्यावर या बाधित कुटुंबीयांच्या सोबत जमिनीवर खाली बसल्या होत्या. ‘तुमच्यावर झालेल्या कारवाईबद्दल ज्यांना कुणाला जाब विचारायचा असेल त्यांच्याकडे आपण तुमच्या सोबत येऊ’ असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले. मात्र, कुटुंबीयांनी आक्रमक होत सुप्रिया सुळे यांच्यासमोर थेट अजित पवार यांचं नाव घेऊन आरोप केला.