राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या बाईला आपण इतकं सिरीयसली का घेतोय, कंगना बाई शुद्धीत नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही अभिनेत्री कंगनाला धमकावल्याचा आरोप कंगनाने केला होता. यानंतर सर्वत्र ट्विटर वॉर सुरु झाले होते. यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाच्या कानशिलात लावण्यासंबंधी ट्विट केले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधान केले होते. त्याशिवाय अनेक नेत्यांनी याबाबत विविध प्रतिक्रिया देत कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला होता.
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता. यावर संजय राऊत यांनीही ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा टोला कंगनाला लगावला होता.