मुंबई – अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यामुळे आता गृहमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपले विश्वासू दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मंगळवारी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार अशी माहिती मिळत आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे अशी राष्ट्रवादीच्या गोटात रंगली होती. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याआधीही गृहमंत्रिपद सांभाळले होते. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद द्यावे अशी चर्चा राष्ट्रवादीत रंगली होती. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी अखेर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार यांनी केला.
यापूर्वीही विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि भाजपने घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले. यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.