अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोनारुग्ण संख्या वाढत असताना रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्याला रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनचा पुरवठा कमी का ? असा सवाल ठाकरे सरकारला विचारला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांची व रेमडेसिव्हीरचा पुरवठ्यांबाबतची आकडेवारी मांडत ‘ज्या जिल्ह्यात कमी एक्टिव्ह रुग्णसंख्या आहे, तेथे हजारोच्या पुढे रेमडेसिव्हीरचा पुरवठा होता. मात्र अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असताना खूप कमी रेमडेसिव्हीरचा पुरवठा केला जात असल्याचा’, आरोप सुजय विखे यांनी केला आहे.
जिल्ह्यात तीन मंत्री आहेत, मात्र आरोप-प्रत्यारोपात मला पडायचे नाही. माझ्यासाठी रुग्णांचा जीव महत्त्वाचा आहे. विखे कुटुंबाकडून 300 रेमडेसिव्हीर मोफत देण्यात आले. या सर्व गोष्टी पुरवण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. अशा प्रकारचा अन्याय नगर जिल्ह्यावर का ? असा सवाल देखील त्यांनी केला.
नगर जिल्ह्यावर रेमडेसिव्हीरच्या वाटपावरून जो अन्याय होतो आहे, तो योग्य नाही. नगर जिल्ह्यातील सर्व सत्ताधारी नेत्यांना विनंती आहे की राज्यात मिळणार साठा तरी जिल्ह्यासाठी आणा, नाहीतर तुमच्या पदाचा वापर या जिल्ह्यासाठी काय करत आहात ? ऑक्सिजनचा पुरवठा देखील नगर जिल्ह्याला कमी झाला आहे, असा आरोप सुजय विखे यांनी केला.