नागपूर: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केद्रात मंत्रिपद मिळत असल्याची चर्चा आहे. मात्र, ही शक्यता स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे. मी महाराष्ट्राबाहेर जाण्याची कोणतीही शक्यता नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशी चर्चा नेहमीच असते, परंतु आमच्या पक्षात आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आदेश देतात तो सर्वांकरिता शिरोधार्य असतो. मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पक्षाचे आणि महाराष्ट्राचे राजकारण ज्याला कळते त्याला हे लक्षात येईल की, मी महाराष्ट्रातून बाहेर जाण्याची कोणतीही शक्यता नाही. खरं म्हणजे जे माझे शुभचिंतक आहेत, त्यांना असं वाटतं की मला दिल्लीत काहीतरी मिळाले तर त्यांना आनंद होत आहे. त्यामुळे त्यांनाही सांगतो की माझी जाण्याची शक्यता नाही. आणि काही लोकांना वाटत आहे की हा दिल्लीला गेला तर बला टळेल, तर बला टळणार नाही, हेही ही मी स्पष्टपणे सांगतो.
सरकार वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेते भेटीगाठी घेत आहेत आणि बैठका घेत आहेत, त्यावर आपली प्रतिक्रिया काय, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, कोणकोण सरकार वाचवत आहे आणि सरकार धोक्यात आहे असे त्यांना वाटत आहे का, याची मला कल्पना नाही. त्यामुळे अशा बैठका ते रोज घेत राहतात. अनेक लोकांना असे वाटते की आम्ही सरकार बनवतो, आम्ही सरकार बिघडवतो आणि आम्हीच सरकार चालवतो, त्यांना समाधान घेऊ द्या, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
‘पटोलेंच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी’
नाना पटोले यांनी ऊर्जा खात्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याबद्दल फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर फडणवीस म्हणाले की, ‘नाना पटोले यांना ऊर्जामंत्रीपद हवे आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ते पत्र लिहित आहे हे सर्वांना माहीत आहे. पण त्यांनी पत्र लिहून शंका व्यक्त केली आहे आणि पुरावेही दिले आहेत त्यामुळे चौकशी तर झालीच पाहिजे. आमचेही हे मत आहे की जर नाना पटोले म्हणत असतील की भ्रष्टाचार आहे आणि प्रदेशाध्यक्षच आपल्याच मंत्र्याविरुद्ध भष्ट्राचार झाला असे सांगत असेल, तर चौकशी केलीच पाहिजे.’