श्रीनगर : गेल्या वर्षी केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटविण्यात आले होते. त्यानंतर तेथील अनेक मोठ्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. जम्मू-काश्मीरला पुन्हा स्वायत्ता मिळून देण्यासाठी आता तेथील स्थानिक पक्षांनी एकत्र येत गुपकार आघाडी केली आहे. यातच आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी जोपर्यंत राज्यात 370 कलम लागू होत नाही, तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.
कलम 370 हटवल्यानंतर मुफ्ती यांच्याकडून सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. जम्मू-काश्मीरला पुन्हा स्वायत्ता मिळून देणे आणि कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी त्या करत आहेत.
जोपर्यंत जम्मू-काश्मीरचं संविधान बहाल केलं जात नाही. जोपर्यंत राज्यात 370 कलम लागू होत नाही, तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, अशी प्रतिज्ञाच त्यांनी आता घेतली आहे.
2018 ला जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू होण्यापुर्वी पीडीपी आणि भाजपमध्ये युती होती. या घटनेची आठवण करून देत त्या म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी राक्षसासोबत एक करार केला होता. काश्मीरच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या वडिलांनी मोदींसोबत हात मिळवला नाही. तर भारताच्या पंतप्रधानांशी हात मिळविला होता.