मुंबई : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ५ एप्रिलपासून नवे करोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या एकीकडे सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, करोना साथीचा हा वाढता फैलाव थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून जे कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यावरून विरोधी पक्ष आणि व्यापारी आवाज उठवताना दिसत आहेत. कालच या नव्या निर्बंधांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निर्बंधांची पुनर्रचना करावी अशी मागणी केली. आता अशाच प्रकारची मागणी, राज्य सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अमरावतीमध्ये करोना साथीला आळा घालण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याच्या आशयाचे पत्र राज्य मंत्री यशोमती ठाकूर यांनी लिहिले आहे. दरम्यान, त्यांच्या या पत्रावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले. ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले आहेत. कोणताही अभ्यास न करता सरसकट लॉकडाऊन कसा अन्यायाने लादला आहे, हे दर्शविणारे यशोमती ठाकूर यांचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला घरातून मिळालेली सणसणीत चपराक आहे,” असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
अमरावतीमधील लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात यशोमती ठाकूर यांनी, जिल्ह्यातील गेल्या दोन महिन्यातील करोना रुग्णांची आणि पॉझिटिव्हिटी रेटची आकडेवारी दिली आहे. सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असलेली रुग्णवाढ आता नियंत्रणात आली असून, त्यामुळे आता करोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करावेत, असे यशोमती ठाकूर यांनी पत्रात स्पष्ट म्हटले आहे.