नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. सुरुवातीला प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातून देखील या आंदोलना पाठिंबा मिळत असून, राज्यातून सुमारे 4 हजार शेतकरी बाईक रॅलीद्वारे दिल्लीला जाणार आहेत.
राज्यातील 21 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, हे शेतकरी नाशिक ते दिल्ली अशी बाईक रॅली काढणार आहेत. हे सर्व शेतकरी ‘ऑल इंडिया शेतकरी सभे’च्या बॅनरखाली बाईक रॅलिद्वारे दिल्लीला जाणार आहेत.
या बाईक रॅलीलमध्ये जवळपास 250 दुचाकी असतील व त्यांना दिल्लीतील आंदोलनापर्यंत पोहचण्यासाठी जवळपास 1300 किमी अंतर पार करावे लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने कृषी कायद्यावर करण्यासाठी पाठवलेले नवे निमंत्रण शेतकरी संघटनांनी अजून स्वीकारलेले नसून, यासंदर्भात शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. शेतकरी नेत्यांशी विज्ञान भवनात झालेल्या तीन बैठका अपयशी ठरल्या आहेत.