मुंबई : तौक्ते वादळामुळे झालेल्या पावसाने मुंबईलाही अक्षरश: झोडपून काढलं. त्यामुळे समुद्र किनारी राहणाऱ्या मच्छिमारांचं मोठं नुकसान झालं असून त्यांची अजूनही दखल घेण्यात आली नाही. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करून घ्या, अशी ऑफरच अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून एका व्हिडीओद्वारे ही ऑफर दिली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कसे अपयशी ठरले आहेत, याकडेही लक्ष वेधले. मे महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ आणि परवा आलेले तौक्ते चक्रीवादळ यामुळे वर्सोवा, मढ, मार्वे, बोरिवली या परिसरातील मच्छिमारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालाडमध्ये झाडाची फांदी पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चाळी, झोपडपट्ट्या, इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या घरगुती साहित्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. झाडे पडल्यामुळे ४८ तासांपेक्षा अधिक काळ अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. मी स्वतः व भाजपने वारंवार मागणी करुनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उपनगरांतील लोकांना करण्यात आली नाही, असा आरोप भातखळकर यांनी केला आहे.
हरवलेले पालकमंत्री @AUThackeray कुणाला दिसले का तौक्ते वादळानंतर ? सापडले तर सांगा आम्हालाही… pic.twitter.com/Ep7vbmVtMP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 24, 2021
मुंबईत वादळ आल्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे हे लोकांना वाऱ्यावर सोडून घरात बसून एसीची हवा खाण्यात मग्न होते. लपूनछपून ताडोबा पर्यटन करणाऱ्या आदित्य यांनी अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी तडफडून, होरपळून मृत्युमुखी पडणाऱ्या मुंबईतील रुग्णांकडे ढुंकूनही पाहिले नाही. आदित्य यांनी मागील वर्षभराच्या काळात एकाही कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयाला भेटी दिल्या नाहीत. त्यामुळे आदित्य यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबई उपनगराच्या नागरिकांसाठी काय काम केले? याचे जनतेला उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी केला आहे.